हिलिंग कोर्स नंतर नोकरी आणि घर हेच रुटीन चालालं होतं.
नवीन असं काही नव्हतं. आपण नेहमी काहीतरी शिकत राहावं असा माझा अट्टाहास असे आणि
मी त्या प्रयत्नात असे. ज्ञानात भर पडत राहावी या साठी मी “कायप्पा” (व्हाट्सअॅप)
मोठ मोठ्या पोस्ट न डावलता वाचून काढे नवीन काहीतरी शिकायला मिळावं की दिवस सत्कारणी
लागला असे वाटे. मी महिन्यात आमच्या सोसायटी कायप्पा ग्रुपवर मोडी लिपीच्या
कार्यशाळेची पोस्ट आली. पोस्ट आल्याआल्याच मी जाणार आहे जाहीर केलंआणि जाऊन कोणी
कोणी येणार का म्हणून विचारणा केली. एक मैत्रीण येणार होती. कंपनी मिळाली होती.
पहिल्याच दिवशी मला ऑफिस मधून निघायला उशीर झाल्याने दांडी झाली. अश्विनी (माझी
मोडी मैत्रीण) मात्र पहील्या दिवशीच हजेरी लावून आली.तिने कार्यशाळेस आवश्यक साधन
सामुग्रीची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी ते साहित्य घेऊन माझा मोडी प्रवास सुरु
झाला.
फार फार तर ३५-३६ जणांचा वर्ग होता. काही निवडक विद्यार्थी
सोडल्यास इतरांना मोडी शिक्षक श्री सुनील कदम सर पूर्वी पासूनच ओळखत असावेत,
त्यांच्या चर्चेतून ते जाणवत असे. अक्षर ओळख होत होती. बऱ्याच अक्षरांची वळणे
बऱ्यापैकी नागमोडी होती. भरपूर सरावाशिवाय ते लिहिता येणे निव्वळ अशक्य होते. मला
वाटे मला जमेल ना ? अश्विनीने ही यापूर्वी मोडी कार्यशाळा केली होती. त्यामुले
तिला मोडीची तोंड ओळख होती. मी ऑफिस घर सांभाळून (कधी कधी जागरण करून)जमेल तसा गृहपाठ
आणि सराव करत होते (जो कधी कधीच पूर्ण असे) पण सरांच्या प्रश्नांची उत्तरे मात्र
काही मुले समजल्या पूर्वीच लगबगीने देत असत. अशाने आपण मागेच राहू असं वाटू लागलं.
हे पाहिलं वर्कशॉप मी अर्ध्याहून सोडून देते कि काय असं मनात येऊ लागलं होतं. एकतर
सर ज्या गतीने शिकवत होते ती सरावाच्या अभावाने मला खूप घाई वाटत होती. शिवाय मोडी
वर्कशॉप जॉईन केल्या पासून मला ओळखणाऱ्या सर्वानीच हे काय आता नवीन अश्या अर्थाचे
चेहऱ्यावर भाव आणले होते. मी माझा गुंता व्हाट्सअॅप वर टाकला. त्या संबंधी वर्गाला
सूचना दिल्या गेल्या. सरणी थोडा वेग कमी केला. इथे अ, आ पासून सुरुवात नव्हती
सोप्या आणि अर्ख्या वळणाच्या अक्षरांपासून
सुरुवात झाली होती. नागमोडी वळणं असलेली मोडी सुंदर आणि सुबक होती. सर मोडी शिकवताना
हाती लागलेल्या संदर्भहुन ऐतिहासिक किस्से सांगत. त्यांच्या विषय रंगवत
सांगण्याच्या पद्धतीमुळे त्या इअतिहासिक घटनेला जिवंतपणा येत असे. आम्ही
विद्यार्थी किस्से ऐकताना रंगून जात असू. शाळेत असताना मला इतिहास विषय सणावळ्यांमुळे
फार किचकट वाटत असे. पण इथलं वातावरणच वेगळं होतं. परिणामी मलाही मोडीची आता गोडी
लागली होती.
बाराखडी पूर्ण झाली. हळू हळू विद्यार्थ्यांची ओळखहि होऊ लागली
होती. वर्गात तिशीच्या आसपास असणारी तरुण मंडळी जास्त होती, म्हणजे सळसळणारे तरुण
रक्त आणि तसाच उसळता उत्साह त्याच्याशी बोलताना कळलं कि मोडी प्रशिक्षण वर्ग चालवण्यामागे
एक गंभीर बाब आणि कळकळ होती. मोडीचे शिक्षक श्री. सुनील सर हे इतिहास अभ्यासक असून
मोडी प्रशिक्षण वर्ग घेण्यामागे त्यांचा विशेष हेतू होता. त्यांनी सांगितलेल्या
ऐतिहासिक गोष्टी मान गर्वाने उंचावली जात होती, अभिमानाने एक शक्ती स्फुरण चढत
होते. सर सांगत होते, मोडी लिपीच्या विस्मृतीत आपल्यामुळे इतिहासातील पाच कोटी
जुने कागद हे पुणे येथे ब्रिटीशांनी गोळा करून ठेवलेले आहेत. यातले केवळ साडेतीन
लक्ष कागद वाचले गेले असून उर्वरित कागद न वाचले गेल्याने शिवरायांचा इतिहास
अजूनही अंधारात असून तो बाहेर आणण्यासाठी हि धडपड आहे. आम्ही विद्यार्थी हे ऐकून
अचंबित झालो नसतो तर नवल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर वाचनाची वेळ आली. शालेय
जिवनात वाचनात कधी अडथळे नाही पण मोडी वाचन मात्र कठीण जात होतं. वर्गात जो धडा वाचायला
उभा राही त्याला वाचन अवघड जात असे. खाली बसून दुसऱ्याला सांगताना मात्र भरभर
वाचता येई. बसले असले कि फार भारी वाटे. पण धडा वाचायची पाळी आली की खरच या वयातही
शाळा आठवे. धडा आणि धडधड यांची छान केमिस्ट्री जुळली होती. काही विद्यार्थी मात्र
फार लवकर वाचू लागले. सर मध्ये मध्ये परीक्षा घेणार म्हणून घाबरवत असत. आतापर्यंत
कोणत्याच कार्यशाळेत परीक्षा प्रकार नव्हता, त्यामुळे सुरुवातीला या गोष्टीचं गांभीर्य
वाटलं नाही. एक दिवस सरांनी पेपर स्वरूप देऊन १०० मार्कांचा असेल म्हणू जाहीर केलं
आणि धाबे दणाणले. ८ जुलैला परीक्षा आणि १० जुलैला चक्क प्रशस्ती पत्रक वितरण सोहळा
होता. परीक्षेच्या दिवशी होता होईल तसा अभ्यास केल्याने जमेल ते लिहून आणि जे येत
नाही त्याला तिलांजली देत पेपर सोडवला. निकाल लागला. सर्वच विद्यार्थी उतीर्ण झाले
होते. सर्तेशेवाई तो दिवस उजाडला. ठाणे येथील ब्राम्हण सेवा संघ या सभागृहात
कार्यक्रम होणार होता. अश्विनीने पाहुण्यांना द्यायला तुळशीची रोपे घेतली. आम्ही
पोहचलो तेव्हा तिथे सगळीच लगबग सुरु होती. सभागृहात प्रवेश केल्या केल्याच डाव्या
हाताला संग्रहित मोडी कागद, इतिहासातील ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक, इतरही मोडी
पुस्तके आणि उजव्या हाताला त्या काळातील लिखाणाचे साधन म्हणजे बोरू, टाक, शिवकालीन
नाणी प्रदर्शाणा साठी ठेवले होते. स्त्रीवर्ग साडीत तर परुषवर्ग सदऱ्या मध्ये उपस्थित
होते. सर्वांच्या भाळी छान चंद्रकोर होती. मला त्यांच्या शरीरावर अदृश्य रूपातील
मावळ्यांचा पेहराव दिसत होता. आमची एक मैत्रीण तर थेट इतिहासाहून परतल्यासारखी वाटत
होती. सभागृहात मंचावर प्रमुख पाहुण्यांची बैठक व्यवस्था तर एका बाजूला प्रोजेक्टर
लागले होते. समोरच छत्रपतींची छोटी मूर्ती. माझे निरीक्षण सुरु होतं. सुनील सर
थोडे तणावात दिसत होते. आदल्या दिवशीही सभागृहात येऊन काहींनी कार्यक्रमाच्या
नायोजनाच्या व्यवस्थेसाठी हातभार लावला होता. वातावरणात कुतूहल, उत्सुकता, कार्यक्रम
तडीस नेण्याची जिद्, तणाव, शंका, आशावाद असे वेगळेच भाव एकाच वेळी पिंगा घालत होते.
गप्पा मारत चहा पोहे घेतले. तिथेही नवीन ओळखी झाल्या. एकंदर सर्व मंगलमय वातावरण
होते. त्या त्या ठिकाणी सर्वच होतं होईल तसे सहकार्य करत होते.
कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे,
ब्राम्हण सेवा संघाचे प्रमुख विश्वस्त श्री अशोक जोशी, रायगड स्मारक मंडळाचे
प्रमुख कार्यवाह श्री सुधीर थोरात आणि विशेश निमंत्रक श्री अप्पा परब येणार होते.
अप्पांना एकदा मोडी वर्गात ऐकले होते. उभा रायगड डोळ्यासमोर जिवंत करण्याची
प्रतिभा त्यांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीत होती. सरांनी बलकवडे सरांबद्दल हि कुतूहल
निर्माण केले होते. त्या मुळे कार्यक्रमाची उत्सुकता अथपासून इतिपर्यंत शिगेस
पोचली होती. अभय सरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस गारद घेऊन सभागृहाला गडाचे
स्वरूप आणले. शिवाजी व संभाजी महराजांच्या जयजयकाराने वातावरण दुमदुमले होते. जणू
तिथे सर्वच मावळे होते. हा अनुभव सर्वस्वी नवीन होता. शरीरावर रोमच उभे राहिले
होते. आपणही त्या ऐतिहासिक क्षणाचा एक महत्वाचा भागाच जणू ! पाहुण्यांच्या
स्वगातानंतर प्रतिमेचे पूजन करताना कवी भूषण यांचे छंद पंकज भोसले या विद्यार्थ्याने
बोलायला सुरुवात केली मात्र, प्रत्यक्ष भूषण अंगी संचारल्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्याचे
हावभाव बदलून गेले. हे छंद मी प्रथमच ऐकत होते. छंद ऐकून राजांबद्दल असणारा
कमालीचा आदर आणिकच वाढला. छंद ऐकून बसलेल्या तरुणाईचे धमन्यातले रक्त नक्कीच सळसळत
असणार. अभय सरांनी उपस्थित पाहुण्यांना स्वगाताहार्य भाषण दिले. प्रक्षाकांमध्येही
बसलेल्या शिवभक्त मान्यवरांचा नामोल्लेख केला गेला. आदरणीय सुनील सरांनीही आपल्या वाक्ताव्यातून
प्रतित करत होते. आमच्या ठाणे कार्यशाळेचे विशेष कौतुक केले गेले.नवा हुरूप चैतन्य
फुलवत होता. ज्या समाजात आपण राहतो, ज्याचे आपण घटक आहोत त्याचं आपण देणं लागतो हि
जाणीव पुन्हा अत्मस्पर्शून गेली. पर्शास्ती पत्रक वितराण सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
३०० गड सर करणाऱ्या हमीदाला उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात
आले. गणेश बोरगे या विद्यर्थ्याने लक्षवेधक मनोगत व्यक्त केले. नीलम काशीद हिच्या
हस्ते आम्हा विद्यार्थ्यांच्या वतीने मानपत्र दिले गेले. सर्वानीच कार्यक्रम योग्य
रीतीने पार पडावा यासाठी कष्ट घेतले होते. सर्वच प्रतिभावान विद्यार्थी,
कलाप्रेमी, छुपे कलागुण अवगत आणि निपुण विद्यर्थी सर्व कौतुकास पात्र होते. मोडी
कार्यशाळा केल्याने सरस्वतीचा वरदहस्त असणाऱ्या या असामान्य विचारवंताचा सहवास
लाबला हे माझे अहोभाग्य !
अध्यात्म समजू लागल्या पासून प्रत्येक घटिका, प्रसंग वाचत
जाण्याची सवय जडली आहे. आजूबाजूला घडत असणारा प्रत्येक प्रसंग काय सांगत आहे हे
निरीक्षण करत वाचण्याची सवय जडली होती. निरीक्षण करताना मिळणारी प्रत्येक शिकवण
उमगत त्या बद्दल परमात्म्याचे आभार मनात जीवनाचा प्रवास मी नव्याने सुरु केला
होताच, त्यातच बहुगुणी दैवी मित्र मंडळींचा सहवास आयुष्य काय सुचवत होते? जीज्ञासा
होतीच आता जिद्दीनेही विराट रूप धारण केले होते. उपस्थित मान्यवरांच्या प्रत्येक
वाक्यातून स्फूर्ती येत होती. हे सर्वच चित्र फार प्रेरणादायी होते.
मी या ऐतिहासिक लोकांमध्ये का आहे हा प्रश्न पडत होता, कारण
इतिहासाची पाळेमुळे खणून काढणारा माझा स्वभाव नव्हता पण मग मी इथे काय करतेय
यांच्यामध्ये?हे जीवात्मे ज्यांनी महाराजांचा इतिहास प्रकाशित करण्याचे वृत घेतले
आहे यांचा सहवास का बरं लाभाबा? काय संकेत आहे हा ? असं वारंवार स्वत:ला विचारात
असताना अचानक ज्येष्ठ अप्पांच्या एका वाक्याने मी शहारले, आणि माझ्या प्रश्नाचे
उत्तर मला मिळाले. “तुम्हाला अशाच अज्ञानाचा वेध घ्यायचा आहे. भूतकाळाकडे बघत
भविष्याकडे नजर ठेवत वर्मानात चालण्यासाठी इतिहास इतिहास शिकायचा असतो” या दोन
वाक्यांनी माझे शंका निरसन झाले . अध्यात्म आणि अज्ञानाचा वेध हे एकमेकांपासून वेगळे
नव्हेच. आता फक्त प्रवाहाबरोबर वाहायचे होते. बलकवडे सरांचे व्याख्यान ऐकून कित्येक
ऐतिहासिक गोष्टी बाहेर आल्या. त्यांनी मारलेले पेशवे दप्तरातील हेलपाटे,
महाराजांचे कर्तुत्व, जोखीम घेऊन अचूक निर्णय घेण्याचे त्यांचे चातुर्य,
जग्गानाथपुरीचा इतिहास, मराठ्यांच्या आदनावांचा इतिहास, मराठ्यांची शोर्यगाथा,
त्यांचे बलिदान, त्यांचा त्याग, मराठ्यांकडे आफ्गाणानी मागितलेले मृतुचे अभयदान,
एकापेक्षा एक रक्त उसळवणारे कतीतरी किस्से सांगताना त्यांनी आम्हाला इतिहास सफर करून
आणली. त्यांच्या व्याख्यानातून प्रत्येक किल्ल्यावर फिरलो. ती सनद, ते मावळे, ते
गाव, सारे जवळून अनुभवत होतो प्रेक्षकवर्ग तन्मय झाला होता. मी तर थेट त्या काळात
गेले होते. सगळंच अद्वितीय होतं. शालेय जीवनात कधीही माहित नसलेला इतिहास ऐकून
मराठ्यांचा वंशज असल्याचा स्वाभिमान वाटत होता. बलकवडे सर व्याख्यानाचा शेवट
करताना मोडी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, मराठ्यांचा वैभवशाली इतिहास
सातासमुद्रापार न्यायाचा आणि जगमान्य करायचा आहे, असे आव्हान घेतले आहे. ते पेलण्याची
ताकद तुमच्यामध्ये आहे. शिवप्रभूंना दिलेल्या वचनांची पूर्तता करायची आहे आणि ती
कधीही व्यर्थ जाणार नाही असं विश्वास व्यक्त करतो. व्याख्यान संपल्यावर वातावरण
शांत झाले होते. त्यांचे आवज्ञ म्हणजे मोडी विद्यार्थ्यांची जबाबदारी होती. काहीतरी
निश्चय करत असल्याचे विचारमग्न चेहरे माझ्या नजरेतून सुटले नाहीत.
कार्यक्रम संपला, पाहुणे निघाले फोटो – सेल्फी काढले गेले,
कॉफी देण्यात आली. सार्वजन हर्षोलासीत दिसत होते. बस झाली मोडी कार्यशाळा! वेळ
देता येत नाही, आता पुन्हा पुढे नको, असं म्हणणारी मी ही मोडी प्रगत वर्गाला नाव
देऊनच प्रसन्न चेहऱ्याने सभागृहाबाहेर पडले.
हेमाद्री अंक १ मधील सौ. वर्षा तायडे ह्यांचा लेख क्र. १९ मोडीची
गोडी पृष्ठ क्र. ६१ https://drive.google.com/file/d/17OMJG9MZ_3H_NRdNSr0IdMWVlMMC13Nr/view?usp=sharing
No comments:
Post a Comment